Nanded Vruttavedh
नांदेड – शिक्षण हे कधीकाळी ‘पवित्र’ आणि ‘समाजसेवेचे’ माध्यम मानले जात होते. मात्र, आजच्या काळात शिक्षणाचे रूपांतर एका नफ्याच्या दुकानात किंवा ‘बाजारात’ झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. श्रीमंत पालक आपल्या मुला-मुलींना महागड्या खाजगी शिक्षणासाठी मोठ्या रकमा मोजत आहेत, तर दुसरीकडे गरिबांची मुले सरकारी शाळा आणि महाविद्यालयांतून संघर्ष करत आहेत. या सगळ्या गोंधळात शिक्षणाचा खरा उद्देश कुठेतरी हरवला आहे आणि त्याचे रूपांतर एका भ्रष्ट उद्योगात झाले आहे. मुळात जे विद्यार्थी ‘ढ’ आहेत किंवा जे अभ्यासात नेहमी मागेच असतात, अशांसाठी ‘शिकवणी’ ही संकल्पना अस्तित्वात आली. शाळेतही अशा विद्यार्थ्यांसाठी वेगळा तास ठेवला जातो. पण सध्याचे चित्र पाहता, अनेक शाळा, महाविद्यालये आणि खाजगी कोचिंग क्लासेस यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप होत आहेत. शासनस्तरावरून प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संख्या ठरवून दिलेली असते, परंतु नफ्यासाठी नियमांना धाब्यावर बसविले जाते. दुर्दैवाने, त्याच वेळी खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये एकाच हॉलमध्ये शेकडो विद्यार्थी कोंबले जातात आणि तिथे नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभाग मात्र नेहमीच डोळेझाक करत असतो. शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळेतच हे कोचिंग क्लासेस भरवले जात असल्याने, विद्यार्थी शाळेत किंवा कॉलेजमध्ये दिसणे आता दुर्मिळ झाले आहे. कोचिंग क्लासेसची बाजारपेठ आता ‘खोट्या जाहिरातींच्या’ बळावर उभी आहे. प्रवेशपूर्व परीक्षांचे आमिष दाखवून विद्यार्थी खेचणे आणि त्यानंतर हुशार विद्यार्थ्यांचे मार्क्स विकत घेणे, हा एक मोठा धंदा झाला आहे. प्रत्यक्ष आपल्या क्लासमध्ये न शिकणार्या पण इतरत्र जास्त गुण मिळवणार्या विद्यार्थ्याला ठराविक रक्कम देऊन ‘हा विद्यार्थी आमचाच आहे’ असे सांगून पालकांना फसवले जाते. ही सर्व एक ‘क्लृप्ती’ आहे, ज्याला भोळे पालक बळी पडत आहेत. या कोचिंग क्लासेसमध्ये हजारो विद्यार्थी प्रवेश घेतात, पण वस्तुस्थिती अशी आहे की, त्यापैकी केवळ २ ते ३ टक्के विद्यार्थीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. जे की, कोणत्याही शाळा, कॉलेजात विद्यार्थी होण्याचे हे प्रमाण आहे. खाजगी क्लासेसमध्ये मात्र उरलेले विद्यार्थी पुन्हा पुन्हा तीच प्रक्रिया राबवत राहतात, ज्यात त्यांचे शैक्षणिक आयुष्य होरपळून निघते. या नैराश्यातून अनेकदा तरुण मुले टोकाची पावले उचलतात, हे अत्यंत भयावह आहे. जो विद्यार्थी भविष्याची स्वप्ने घेऊन शिक्षणासाठी येतो, तो या ‘शिक्षणाच्या बाजारात’ स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याला आणि भविष्याला मुकतो. शिक्षण हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे, तो नफ्याचा विषय असूच शकत नाही. जेव्हा शिक्षण ‘बाजारातील वस्तू’ बनते, तेव्हा ते केवळ श्रीमंतांची मक्तेदारी बनते आणि गरिबांच्या वाट्याला केवळ संघर्ष येतो. जोपर्यंत शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेसचे हे अनैतिक साटेलोटे उघड होत नाही आणि शिक्षण विभागाकडून कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा ‘बाजार’ असाच फोफावत राहील. आपल्या मुला-मुलींना उच्च दर्जाचे आणि दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. हा बाजार बंद करून शिक्षणाला पुन्हा एकदा ज्ञानार्जनाचे आणि चारित्र्य घडविण्याचे माध्यम बनवणे, ही काळाची गरज आहे. अन्यथा, आपण एक संपूर्ण पिढी या भ्रष्ट व्यवस्थेच्या बळी देताना उघड्या डोळ्यांनी पाहत राहू.







