Nanded Vruttavedh
नांदेड : खा. अशोक चव्हाण हे राज्याचे नेते होते, आहेत व राहतील, यात तीळमात्र शंका नाही. त्यांचा सन्मान व त्यांना न्याय देण्याचा विषय भाजप श्रेष्ठी पाहतील. परंतु, तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाचे व महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजले आहेत. नेते पक्ष सोडत आहेत. भविष्यात तुमचा पक्ष दुर्बीण लावूनही सापडणार नाही, अशा वेळी अशोकराव चव्हाण व भाजपवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, असे भाष्य करत आ. अमरनाथ राजूरकर यांनी आ. रोहित पवार यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा आभास निर्माण करत पक्ष वाचविण्याच्या धडपडीत राज्यभर फिरणाऱ्या आ. रोहित पवार यांनी नांदेड मध्ये येऊन नको त्या गोष्टीत नाक खुपसले व खा. अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकीर्दीवर भाष्य केले. त्याला उत्तर देताना आ. राजूरकरांनी खा. अशोक चव्हाण यांच्या कारकीर्दीचा आढावा मांडला. 2009 च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने विधानसभेत 62 वरून 82 व अपक्षांसह 100 आमदार तर लोकसभेत 6 वरून 17 खासदार, अशी मजल मारली होती. त्यांचे नेतृत्व व कर्तृत्व पाहून आपले आजोबा खा. शरदचंद्र पवार हे सुद्धा आचंबित झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. अशोक चव्हाण यांच्यासोबत चर्चेस बसण्यास घाबरत होते. अशी आठवण आ. राजूरकर यांनी आ. पवार यांना करून दिली.
2009 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला राज्यात एवढा प्रचंड विजय मिळवून दिल्यानंतर या पक्षाने अशोकरावांना कोणता न्याय दिला. त्यांना मुख्यमंत्री पदावरून केवळ एका वर्षात पायउतार व्हावे लागले. त्यावेळेस तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूग गिळून का गप्प बसला होता. कदाचित तुमच्या पक्षातील नेत्यांनी केलेले वेगवेगळे भ्रष्ट्राचार उघड होण्याची त्यांना भीती होती का, असा सवाल आ. राजूरकर यांनी केला आहे.
खा. अशोक चव्हाण हे निष्कलंक चारित्र्याचे धनी असल्यामुळे त्यांनी न्यायालयीन लढाई लढून आपले निर्दोषत्व सिद्ध केल्यानंतरही काँग्रेस पक्षाने त्यांना अडगळीत टाकण्याचे काम केले. राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांविषयी असलेली ही आकसबुद्धी या विषयी भाष्य करण्याऐवजी भाजपने खा. अशोक चव्हाण यांचे काय केले, असा बाळबोध प्रश्न करण्याचा तुम्हाला अधिकार काय, असा सवाल करत भारतीय जनता पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत न्याय देणारा पक्ष आहे. याच पक्षाने भाजपात आल्या आल्या त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली. संसदेत देशाच्या पातळीवर स्थापन झालेल्या अनेक समित्यांमध्ये ते काम करत आहेत, असे आ. राजूरकर यांनी लक्षात आणून दिले.
आ. रोहित पवार यांच्या पक्षाची विधानसभेत दयनीय अवस्था आहे. जनतेला भूलथापा देऊन लोकसभेत जे खासदार तुमच्या पक्षातून निवडून आले, तेही या बुडत्या जहाजातून उड्या मारण्याच्या तयारीत आहेत. तुमचा पक्ष व ज्या आघाडीत आपण आहात त्या तथाकथित महाविकास आघाडीचे जहाज जवळजवळ बुडल्यात जमा आहे. दररोज लोकप्रतिनिधी तुम्हाला सोडून जात आहेत. याचे चिंतन आधी करा, असा टोला लगावला.





