नांदेड: उन्हाची तीव्रता वाढल्याने एकीकडे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचे आदेश नुकतेच जारी केले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत, शहरातील डी-मार्ट परिसरातील नारायणा स्कूलमध्ये रविवारी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी आलेल्या शेकडो चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यवस्थापनाने दुपारी भर उन्हात बसवून जेवण करण्यास भाग पाडले. बाहेरचे तापमान ४२ अंशांच्या पार असतानाही प्रशासनाने दाखवलेल्या या अमानवीय वागणुकीमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी विविध शाळांमधील विद्यार्थी या केंद्रावर आले होते. दुपारच्या सुट्टीत जेव्हा मुले जेवणासाठी बाहेर आली, तेव्हा त्यांना शाळेच्या बागेत किंवा झाडांच्या सावलीत बसू देण्यास शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट नकार दिला. “शाळेचे नियम” सांगत कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना झाडाखालून हाकलून दिले आणि त्यांना उघड्या प्ले-ग्राउंडवर भर उन्हात बसण्यास भाग पाडले.
दुपारची वेळ असल्याने सूर्याचा प्रचंड तडाखा होता. अशा परिस्थितीत लहान मुले उघड्या मैदानावर बसून आपला डब्बा खात होती. जवळपास दीड तास हे विद्यार्थी उन्हात भाजले जात होते. पालकांनी वारंवार विनंती करूनही शाळा प्रशासनाने लवचिकता दाखवली नाही. “जर एवढ्या उन्हात एखाद्या मुलाला उष्माघाताचा त्रास झाला असता, तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल पालकांनी यावेळी उपस्थित केला.
शाळेच्या या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या पालकांनी सोशल मीडिया आणि मेसेजद्वारे आपला निषेध नोंदवला आहे. एका पालकाने भावना व्यक्त करताना सांगितले की, “आमच्यासाठी मुलांचा जीव कोणत्याही परीक्षेपेक्षा मोठा आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना वागणूक देणाऱ्या शाळेत भविष्यात कोणतीही स्पर्धा परीक्षा घेऊ नये. ४२ डिग्री तापमानात मुलांना दीड तास उन्हात उभे करणे म्हणजे क्रूरता आहे.”
दरम्यान, या घटनेनंतर शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासन संबंधित शाळेवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत परीक्षा घेताना किमान पिण्याचे पाणी आणि सावलीची व्यवस्था करणे हे परीक्षा केंद्राचे कर्तव्य असते, परंतु नारायणा स्कूलने या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.





