Nanded Vruttavedh
नांदेड – महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (Special Intensive Revision) सुधारित कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोकण, मुंबई आणि राज्यातील इतर काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मतदार नोंदणी व पडताळणीच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक कार्यालयाने मुदत वाढवून देण्याची विनंती भारत निवडणूक आयोगाकडे केली होती. ही विनंती मान्य करत केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ जुलै २०२६ च्या पत्रान्वये नवीन सुधारित वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे.
या सुधारित कार्यक्रमानुसार, मतदार केंद्रस्तरीय अधिकार्यांमार्फत (BLO) केली जाणारी घरोघरी भेट आणि पडताळणीची प्रक्रिया आता ३० जून २०२६ ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पूर्ण केली जाईल. त्यानंतर मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्याचे काम ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत चालणार असून, १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी केली जाईल. नागरिकांना आपल्या हरकती आणि दावे नोंदवण्यासाठी १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे.
प्राप्त झालेले दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्ण केली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ (सोमवार) रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या सुधारित वेळापत्रकाला विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी द्यावी, तसेच स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांना हे वेळापत्रक लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावे, असे आदेश उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म. रा. परिहर यांनी दिले आहेत.





