नांदेड शहराला आता दोन दिवस आड पाणी पुरवठा; महापालिकेत पाणी पुरवठा विभागाचा मनपा आयुक्तांनी घेतला आढावा
नांदेड – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नांदेड महानगरपालिकेकडून नागरिकांना तीन ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे वधरण उशाला आणि कोरड घशालाव अशी परिस्थिती झाली होती. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. खरंतर दिवसाआड पाणी करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नांदेडकर करीत आहेत. परंतु कोट्यावधी रुपये खर्च करू नाही महापालिका प्रशासनाकडून नागरिकांची ही मागणी पूर्ण केली जात नाही. पण उशिरा का होईना मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी आज पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन यापूर्वीच घोषित केलेला दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पुन्हा एकदा दिल्या आहेत.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी पाणी पुरवठा विभागाची आज आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये शहरातील पाणी पुरवठा प्रथम प्राधाण्याने सुरळीत करण्याच्या सुचना त्यानी दिल्या आहेत. काबरा नगर, डंकीन, सिडको व असदवन येथील जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणाऱ्या पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार सद्यस्थितीमध्ये झोन क्र.१ तरोडा-सांगवी, झोन क्र.४ वजिराबाद व झोन क्र.६ सिडको-हडको-कौठा या भागामध्ये दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच झोन क्र.२ अशोक नगर, झोन क्र.३ शिवाजी नगर व झोन क्र.५ इतवारा-देगलुर नाका या भागातील जलकुंभावरुन तीन दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
त्याअनुषंगाने डंकीन जलशुध्दीकरण केंद्र संपुर्ण क्षमतेने चालवुन इतर जलशुध्दीकरण केंद्रावरील ताण कमी करणे आवश्यक असुन त्याचप्रमाणे काबरा नगर जलशुध्दीकरण केंद्रावरील ताण कमी करण्यासाठी कोटीतीर्थ पंपगृह ते डंकीन जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत करण्यात येणारी ७५० मी.मी. व्यासाची ६.३ कि.मी. लांबीची मुख्य जलवाहीणीचे काम तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले आहेत. तसेच ज्या भागामध्ये तीन दिवस आड पाणी पुरवठा होत आहे त्या भागात आता दिनांक ०१.०९.२०२५ पासुन दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्यासाठी आयुक्तांनी आदेशीत केले आहे.
तसेच सर्व जलशुध्दीकरण केंद्र व पंपगृह येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होत असतांना सुध्दा शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांना सांगितले.
सदरील बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, उपअभियंता प्रकाश कांबळे, नरेंद्र सुजलेगांवकर, कनिष्ठ अभियंता सरपाते, जक्कीउल्ला खाँन, स्वामी, शेख जैनोद्दीन यांची उपस्थिती होती.






