गोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न
नांदेड : शहराजवळ वाजेगाव परिसरात गोळीबार झाल्याची माहिती बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी वाऱ्यासारखी पसरली होती. एका तरुणावर अज्ञातांनी गोळीबार करून टोळीयुद्धाचीही प्राथमिक चर्चा होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या. यात पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, संबंधित तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, असद मदनी कॉलनी येथील रहिवासी शेख समी उर्फ अरबाज (वय २५ वर्ष) याने ११ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास वाजेगाव येथील छोटा बंधारा पुलावर ही बनावट घटना घडवून आणली. त्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, सय्यद आवेज, शाहरुख कबुतर आणि अबू शूटर यांच्यासह आठ जणांनी त्याला अडवून त्याच्यावर गोळीबार केला, ज्यामध्ये एक गोळी त्याच्या उजव्या हाताच्या दंडाला लागली.
पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान फिर्यादीने वारंवार आपले जबाब बदलले, घटनास्थळाची परिस्थिती आणि प्रत्यक्ष पुरावे यांचा मेळ बसत नव्हता या संशयास्पद बाबी समोर आल्या. आरोपींनी आपल्याकडे गावठी पिस्तूल असल्याची टीप पोलिसांना दिली असावी, असा संशय शेख समी ऊर्फ अरबाजला होता. याच रागातून समोरच्या गटाला अडकवण्यासाठी त्याने स्वतःकडे असलेल्या गावठी पिस्तूलने स्वतःच्याच दंडावर गोळी झाडून घेतली आणि इतरांच्या नावे तक्रार दिली.
दरम्यान, लोकसेवकास खोटी माहिती देऊन दुसऱ्याचे जीवित धोक्यात घालणे आणि चुकीचा दोषारोप करणे या कारणास्तव पोलिसांनी शेख समी उर्फ अरबाज याच्यावरच गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय शस्त्र अधिनियमाच्या विविध कलमान्वये (कलम १०९ (१), ३५१(२), ३५२, १८९(२), १९१(३) आणि ३/२५, ३/२७) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या अत्यंत चाणाक्षपणे केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.





