क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या
नांदेड/मुखेड:
राजकारणाची आणि सत्तेची हाव माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक अत्यंत विदारक प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आला आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच पद मिळवण्यासाठी एका पित्याने आपल्या सात वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निवडणूक लढवण्यासाठी ‘तीन अपत्य’ अडथळा ठरत असल्याने नराधम पित्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर येथील रहिवासी पांडुरंग कोंडामंगले (३२) याला आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी निवडणूक लढवायची होती. मात्र, महाराष्ट्र निवडणूक नियमानुसार दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही. पांडुरंगला तीन मुले होती, जे त्याच्या राजकीय स्वप्नांच्या आड येत होते.
असा रचला कट
तीन दिवसांपूर्वी, साहित्य खरेदीला जातो असे पत्नीला सांगून पांडुरंगने आपली सात वर्षांची मुलगी प्राची हिला सोबत नेले. तिला त्याने शेजारच्या तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन रोडवरील निजाम सागर कॅनॉलमध्ये जिवंत फेकून दिले. या क्रूर कृत्यानंतर तो निर्विकारपणे घरी परतला. मात्र, कॅनॉलमध्ये मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर तेलंगणा पोलिसांनी तपास चक्र फिरवली.
पोलिसांकडून अटकेची कारवाई
निजामाबाद पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित म्हणून ३० जानेवारी रोजी मुखेडमधून पांडुरंगला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. धक्कादायक बाब म्हणजे, या गुन्ह्यात त्याला केरूरचे विद्यमान सरपंच गणेश यांनी देखील मदत केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.
“निवडणूक लढवण्यासाठी तीन अपत्ये अडसर ठरत असल्याने आरोपीने हे कृत्य केले आहे. आम्ही मुख्य आरोपीसह त्याला सहकार्य करणाऱ्या सरपंचालाही अटक केली आहे.”
— साई चैतन्य, पोलीस आयुक्त, निजामाबाद
या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. एका निष्पाप बालिकेचा बळी घेणाऱ्या या प्रवृत्तीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.





