सुरेश गायकवाड यांचा ६९ वा वाढदिवस नांदेडमध्ये उत्साहात साजरा; ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – गायकवाड यांचे आवाहन
Nanded Vruttavedh ।
नांदेड – आंबेडकरवादी लोक मंचच्या वतीने काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक सुरेश गायकवाड यांचा ६९ वा वाढदिवस आज नांदेड येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशनगर परिसरातील ‘अल्वी’ या त्यांच्या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त विशेष अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती.
वाढदिवस संयोजन समिती व खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सुरेश गायकवाड यांचा पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जनार्दन कवडे होते.
यावेळी सुरेश गायकवाड यांच्या सुविद्य पत्नी अंजली गायकवाड, खासदार रवींद्र चव्हाण, बाबा गौड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफार, नगरसेवक मुन्ना अब्बास हुसैन, आनंद चव्हाण, डॉ. उत्तम सोनकांबळे, सुरेश हाटकर, कौठेकर, प्रा. देविदास मनोहरे, बी. बी. पवार, नंदकुमार बनसोडे, शिलरत्न चावरे, महेंद्र पिंपळगावकर, पद्माकर सोनकांबळे, भगवान गायकवाड आणि एम. जी. बदलगावकर यांच्यासह सुरेश गायकवाड यांच्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना सुरेश गायकवाड यांनी चळवळीच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकला. “आता चळवळीचे संदर्भ बदलले आहेत आणि आजच्या तरुण पिढीने हे संदर्भ समजून घेण्याची अत्यंत गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रातूनच आपल्याला आजच्या काळातील प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
काँग्रेस पक्षातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना गायकवाड म्हणाले, “काँग्रेसमध्ये मला अजूनही फारसे महत्त्व दिले जात नाही. तरीही, जोपर्यंत भारतीय जनता पक्ष १०० ते १२५ च्या संख्येपर्यंत खाली घसरत नाही, तोपर्यंत मी काँग्रेसमध्येच कार्यरत राहणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आता निश्चितपणे सत्ताबदल होणार आहे.”
पुढे बोलताना त्यांनी संविधानाच्या रक्षणाचा इशारा दिला. “केंद्र सरकार आधी स्वतःच्या स्तरावर आणि नंतर राज्यांच्या संमतीनुसार संविधान बदलण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे देशाचे संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेवरून हद्दपार करणे गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. उत्तम सोनकांबळे यांनी अत्यंत भावूक उद्गार काढले. “सुरेश गायकवाड यांची आमदार होण्याची संधी मागच्या काळात थोडक्यात हुकली. त्यांनी आपली संपूर्ण हयात फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीसाठी अर्पण केली आहे. येणाऱ्या काळात सुरेशदादा आमदार व्हावेत, हीच माझी शेवटची इच्छा आहे,” असे डॉ. सोनकांबळे म्हणाले.
खासदार रवींद्र चव्हाण यांनीही सुरेश गायकवाड यांच्या योगदानाचा गौरव केला. “सुरेश गायकवाड हे काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. त्यांनी आता नवीन आमदार व खासदार घडवण्याचे काम करावे आणि आपल्या दीर्घ अनुभवाचा जनतेला फायदा करून द्यावा. आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. योग्य वेळ आली तर तुमचे आमदार, खासदार होण्याचे स्वप्न नक्की पूर्ण करू,” अशी ग्वाही खा. चव्हाण यांनी आपल्या भाषणात दिली.





