गोदावरी नदी पात्रात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू
नांदेड : शहरातील साठे चौक परिसरातील तीन लहान मुले गोदावरी नदीच्या नगीना घाट येथे पोहण्यासाठी गेली असताना, त्यातील दोन मुलांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातामुळे संपूर्ण नांदेड शहरात आणि विशेषतः साठे चौक परिसरात कमालीची खळबळ उडाली असून, परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
रणवीर यशवंत शिंगाडे (वय १४ वर्षे) आणि गणेश डोंगरे (वय १३ वर्षे, दोघे रा. तुकामाई हॉस्पिटल समोर, साठे चौक, नांदेड) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी बालकांची नावे आहेत. उपलब्ध माहितीनुसार, उन्हाळ्याचे दिवस असल्याने हे दोघे त्यांच्या आणखी एका मित्रासोबत सायंकाळच्या सुमारास नगीना घाट येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे जण खोल पाण्यात वाहून गेले आणि त्यांचा बुडून अंत झाला.
नदीपात्रात मुले बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली, मात्र दुर्दैवाने तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे दोन निष्पाप मुलांचे छत्र हरपल्याने शिंगाडे आणि डोंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, साठे चौक परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.





