
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. सुरेश सावंत यांचा पालकमंत्री अतुल सावे व खा. अशोक चव्हाणांनी केला सत्कार
नांदेड – ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पालकमंत्री ना. अतुल सावे आणि माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी आज त्यांच्या घरी जाऊन डॉ. सावंत यांचा सपत्नीक सत्कार केला.
दोन दिवसांपूर्वीच डॉ. सुरेश सावंत यांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तेव्हापासून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अतुल सावे आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने नांदेड शहरात आले असता खा. अशोक चव्हाण यांनी डॉ. सुरेश सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन करण्याची सूचना मांडली. त्या सूचनेला पालकमंत्र्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत डॉ. सुरेश सावंत यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. बैठक संपताच शासकीय वाहनांचा भला मोठा ताफा डॉ. सावंत यांच्या शाहूनगरातील निवासस्थानाकडे रवाना झाला. यामध्ये पालकमंत्री ना. सावे आणि खा. अशोक चव्हाणांसह खा. डॉ. अजित गोपछडे, भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष, अमरनाथ राजूरकर यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली आदींचा समावेश होता.
पालकमंत्र्यांना परिचय करून देताना खा. अशोक चव्हाण यांनी डॉ. सुरेश सावंत हे ४० वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व साहित्य चळवळीत अग्रणी असल्याचे सांगितले. त्यावर डॉ. सुरेश सावंत यांनी डॉ. शंकरराव चव्हाण हे संस्कारांचे विद्यापीठ होते आणि मी त्या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, असे सांगितले. शंकररावांच्या जीवनकार्यावर लिहिलेले ‘जलशंकर’, ‘आधुनिक भगीरथ’ व ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ तसेच ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी’ हे चार ग्रंथ डॉ. सावंत यांनी पालकमंत्री अतुल सावे यांना भेट दिले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही यावेळी डॉ. सुरेश सावंत यांना एक पुस्तक भेट दिले. सर्व उपस्थित मान्यवरांनी डॉ. सुरेश सावंत यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.